Monday, February 11, 2013

"ग्रेट भेट" 
with विनय आपटे ..




            स्पंदन आयोजित 'ग्रेट भेट' कार्यक्रमात विनय आपटे यांच्या मुलाखतीच्या  रूपाने रसिक प्रेक्षकांना एक सुंदर कार्यक्रमाची 'भेट' मिळाली . कार्यक्रमाला  रसायन तंत्रज्ञान संस्थेचे प्रा. भागवत सर, प्रा. पटवर्धन सर, प्रा. श्रीराम सर, प्रा. सौ. मराठे  तसेच आई. सी. टी . तील सर्व रसिक प्रेक्षक (नेहमीप्रमाणे ) उपस्थित होते. :) 

                      
                           
                  कार्यक्रमाची सुरुवात विनय आपटे यांची  ओळख करून देणाऱ्या एका चित्रफितीने झाली . (http://www.youtube.com/watch?v=2bu8J4KsVtI) विनय आपटे यांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत झाले. यानंतर अश्विनी आणि नम्रता यांनी कार्यक्रमाला सुरुवात करून श्री . विनय आपटे यांची थोडक्यात ओळख करून दिली. 'परिचयाची ज्यांना गरज नाही' , असे सुद्धा विनयजीं बद्दल म्हणता येईल. :) तरीही, असो. 
                  
                
                             यानंतर अमृताने मुलाखतीच्या\ कार्यक्रमाची सूत्रे हाती घेतली. पहिला प्रश्न होता विनय आपटेंना, त्यांच्या करिअरच्या वाटचालीबद्दल. त्यांच्या करिअर च्या  सुरुवातीच्या  काळात, त्यांना ARMY मध्ये जाण्याची इच्छा होती. महाराष्ट्रातील निवडक ६ जणांमध्ये सुद्धा ते होते. पण  त्यानंतर , अभिनय कलेत  असणारी आवड लक्षात घेता , त्यांनी या क्षेत्रामध्ये  येण्याचे ठरवले. रुईया महाविद्यालयातून  एकांकिकेचे अनेक प्रयोग करत त्यांनी आपली नात्याकालेची आवड पुरेपूर जोपासली. पुढे दूरदर्शन मध्ये काम करत असतांना सुद्धा त्यांनी काम सांभाळून अनेक नाटकांमधून काम केले. जमलेल्या श्रोत्यांना संदेश देतांना त्यांनी सांगितले की आपली आवड जोपासणे हे आपल्या करिअर मध्ये पुढे जाण्याइतकेच महत्त्वाचे आहे.  पण या दोहोंमध्ये कधी गफलत होण्याची गरज नाही. हाती घेतलेले काम आवर्जून पूर्ण करावे. 

                  



                   रसिक श्रोत्यांना एका थोर कलाकाराचे अनुभव ऐकण्याची एक अपूर्व संधी मिळाल्यामुळे सर्वच कुतूहलाने आणि आनंदाने ऐकत होते. विनयजींच्या  मनमोकळ्या स्वभावामुळे सर्वच रसिकांची मने खुलली होती. पुढील प्रश्नामध्ये विनयजींना विचारण्यात आले, की  एखादा कलाकार एखादी भूमिका करतांना त्यात कितपत स्वतःला  गुंतवू शकतो . यावर विनयजींचे विनम्र मत होते की , कला ही  अशी गोष्ट आहे की जीचा योग्य  वेळी योग्य वापर करता आला पहिजे . भूमिका जरूर मन लावून करावी, पण नाट्यातील पात्र आणि 'आपण' यातील अंतर नेहमी ओळखून असावे म्हणजे गफलत होणार नाही. 

                     आपण ठरवलेल्या सर्वच गोष्टी जीवनात नेहमीच त्यानुसार होतातच असे नाही. यानंतरचा प्रश्न होता, अशा एखाद्या भुमिकेबद्द्ल जी त्यांना मिळाली नाही. याबद्दल विनायजींनी १९७६ मधील एका नाटकातील भूमिकेबद्दल आठवण सांगितली. ती  भूमिका सुरुवातीला इतर एका कलाकाराला देण्यात आली होती. पण विनयजींना जेव्हा नंतर ही भूमिका  करण्याची संधी मिळाली, तेव्हा त्यांना एका मोठ्या कलाकाराकडून  'तुझा जन्म ही भूमिका करण्यासाठीच झाला होता , असे वाटले ' अशी कौतुकाची थाप मिळाली. 

                       विनयजींच्या भूमिकांमधून दिसणारी बेधडक वृत्ती हा पुढील प्रश्नच विषय होता. यावर श्रोत्यांना आपल्या अनुभवातून त्यांनी हे सांगितले की - बेधडक आणि स्पष्ट वृत्ती तुम्हाला जीवनात गैरसमज टाळायला नेहमीच पूरक ठरेल. त्यामुळे नेहमीच योग्य त्या वेळी योग्य ते आणि 'खरे 'तेच  बोलले तर माणूस भविष्यातील अनेक गैरसमाजांपासून दूर राहू शकतो . 
                       विनयजींच्या शब्दातील ताकदीला रसिकांनीसुद्धा टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली.    



                      
                               जीवनात धैर्य  आणि  प्रोत्साहन देणारी व्यक्ती कोण होती, या अमृताच्या प्रश्नाला 'माझी आई' हे विनय  जींचे भावूक उत्तर होते. यातून त्यांच्या स्वभावातील हळवी बाजू दिसून आली.  अभिनयाच्या बरोबरच त्यांनी दिग्दर्शनातही आपला ठसा उमटवला. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक मालिका तसेच नाटके रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.  

                        आत्तापर्यंत केलेल्या भूमिकां मधील सर्वात आवडती भूमिका या प्रश्नाचे उत्तर देतांना  त्यांनी  सांगितले की,  सर्वच भूमिका मन लावून केल्या तर प्रत्येक भूमिका आपलीशी आणि तितकीच महत्त्वाची वाटते. त्यामुळे हाती घेतलेले काम पूर्ण प्रयत्नाने आणि  मन  लावून करावे असा संदेश त्यांनी श्रोत्यांना  दिला.  

                        मराठी चित्रपट आणि रंगभूमीच्या सध्याच्या प्रगतीबद्दल सांगताना त्यांनी रसिक प्रेक्षकांना महिन्यातून बघितल्या जाणाऱ्या सरासरी  ४ चित्रपटांपैकी २ तरी मराठी असावेत असा निश्चय करण्याचे आवाहन केले. मराठी चित्रपट जगवणे ही  फक्त सरकारचीच जबाबदारी नाही, तर प्रेक्षकांनी सुद्धा आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगून मराठीत होणाऱ्या उत्तम कलाकृतींना दाद दिली पाहिजे असेही ते म्हणाले.
                        
                        



                    राजकारण्याची भूमिका अनेक चित्रपटांतून आणि नाटकामधून वठवूनसुद्धा विनयजींनी  प्रत्यक्ष जीवनात राजकारणापासून दूरच राहिले . :) पण तरीही , सरकारात  संधी मिळाल्यास सांस्कृतिक विभागातून   मराठी  सिनेसृष्टी व रंगभूमीला एक नवा मान मिळवून देण्याचे आणि त्यांच्या  उद्धारासाठी  काम करण्याचे  त्यांनी मनोगत व्यक्त केले.   

                          मुलाखतीच्या शेवटी 'झटपट ' प्रश्नोत्तरात त्यांनी दिलखुलासपणे आपल्या आवडी- निवडींबद्दल सांगितले. यानंतर  श्रोत्यांकडून आलेल्या अनेक प्रश्नांवर  विनयजींनी  प्रोत्साहनपर  मार्गदर्शन केले. 

                           कार्यक्रमाची सांगता होऊन रसिक श्रोते एका अव्वल कलाकाराच्या भेटीचा आनंद घेऊन सुखाने परतले. आता प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगून आपल्या मायबोलीला सतत सर्वांच्या पुढे ठेवण्याचा मनात निश्चय केला होता...